सांगली: जत तालुक्यातील आणि सीमावर्ती भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी शासन कटिबद्ध असून, जत उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीमुळे ग्रामीण भागात आधुनिक आरोग्य व सुसज्ज उपचार व्यवस्था निर्माण झाली आहे. या रुग्णालयाचा फायदा जत परिसरासह कर्नाटक राज्यातील व जत पूर्व भागातील गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
जत येथील अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, सभापती अर्चना पाटील, तहसीलदार प्रवीण धानोरकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
उल्लेखनीय म्हणजे, तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून यापूर्वीही जतचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी टप्प्याटप्प्याने विकास आराखडा तयार करा अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या होत्या.
रुग्णालयातील प्रमुख सुविधा आणि वैशिष्ट्ये
- ३० वरून ५० खाटांची क्षमता: जत येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवाढ करून आता ५० खाटांचे अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे.
- भव्य इमारत: ३ मजली इमारतीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ३,३३२.२९ चौरस मीटर असून यासाठी तब्बल ९३ कोटी ४ लाख रुपयांचा (रु. ९३०४.०० लक्ष) निधी खर्च करण्यात आला आहे.
- डायलिसिस व एक्स-रे केंद्र: ग्रामीण भागातील रुग्णांना तपासणी व उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागू नये यासाठी लवकरच येथे एक्स-रे आणि स्वतंत्र डायलिसिस सेंटर सुरू केले जाईल.
- कार्डियाक रुग्णवाहिका: जतसाठी मंजूर करण्यात आलेल्या कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी तज्ज्ञ डॉक्टर, तांत्रिक स्टाफ आणि चालक यांची तत्काळ सोय केली जाईल.
- अतिरिक्त वैद्यकीय पदे: रुग्णालयात ७ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांची अतिरिक्त पदे मंजूर करण्यात आली आहेत.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी शासन पातळीवर विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. नुकतेच स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण करण्यात आले होते. त्याच धर्तीवर जतमधील हे रुग्णालय दुर्गम भागातील नागरिकांसाठी संजीवनी ठरणार आहे.
माता व बाल आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाषणात स्पष्ट केले की, सुदृढ भावी पिढी घडवण्यासाठी गर्भवती महिलांचे आरोग्य आणि पोषण अत्यंत महत्त्वाचे आहे. जत उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षित प्रसूती, वेळेवर आरोग्य तपासणी, माता-बाल संगोपन आणि राष्ट्रीय आरोग्य योजनांची गतिमान अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स, आरोग्यसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.