टेक-वारी 2.0: आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होणार महाराष्ट्राचे प्रशासन
विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रशासकीय कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने प्रेरित होऊन राज्य सरकारतर्फे ‘टेक-वारी 2.0’ (Tech-Vari 2.0) हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला एक नवी आणि प्रगत दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित ‘टेक-वारी 2.0 – महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत आयोजित विशेष पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान्यांपर्यंत सेवा पोहोचवणार
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, सामान्य प्रशासन विभागाने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांपर्यंत शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागांनी तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती स्वीकारणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे महसूल विभागातही तंत्रज्ञानाचा वापर वाढवून पारदर्शकता आणली जात आहे, ज्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पाणंद रस्ते आणि जमीन मोजणी प्रक्रियेला आता अधिक वेग मिळणार आहे.
‘टेक वारी’ हा देशातील सर्वात मोठा डिजिटल प्रशिक्षण उपक्रम
सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या उपक्रमाचे महत्त्व विशद करताना त्याची तुलना पंढरपूरच्या वारीशी केली. वारीमध्ये ज्याप्रमाणे शिस्त आणि सातत्य असते, तसेच प्रशासनात तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती असावी, असे त्यांनी नमूद केले. या उपक्रमात राज्यातील सुमारे ५ हजार कर्मचारी प्रत्यक्ष आणि तब्बल ९ लाख कर्मचारी ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले आहेत, ज्यामुळे हा देशातील सर्वात मोठा तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण उपक्रम ठरला आहे.
शेलार यांनी असेही स्पष्ट केले की, डिजिटल साक्षरता हीच आजच्या काळातील खरी साक्षरता आहे. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर करताना मानवी दृष्टिकोन महत्त्वाचा असतो, कारण ‘एआय’ तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी ते मानवी संवेदनांची जागा घेऊ शकत नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रशासन होणार ‘फ्युचर रेडी’
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी राज्य प्रशासनातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने स्वतःला ‘फ्युचर रेडी’ (Future Ready) बनवणे गरजेचे आहे. ‘टेक वारी’मुळे प्रशासकीय कामात गती येईल आणि सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निवारण लवकर होईल.
गुणवंतांचा गौरव
‘कर्मयोगी भारत’ सप्ताहात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी प्रास्ताविकात या प्रशिक्षण सप्ताहातील सायबर सुरक्षा, डीपीडीपी आणि नवीन तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवरील सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि राज्यभरातून आलेले पुरस्कारप्राप्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.