म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग (U Min Aung Hlaing) सध्या भारत दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान मुंबईत त्यांचे अतिशय उत्साहात आणि भव्य स्वागत करण्यात आले. मुंबईतील प्रसिद्ध ‘लोकभवन’ येथे या विशेष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांचे अत्यंत आदरपूर्वक स्वागत केले.
या ऐतिहासिक सोहळ्याला अनेक प्रमुख राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार प्रामुख्याने उपस्थित होते. यापूर्वी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाइंग मुंबईत दाखल झाले तेव्हा विमानतळावरही त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते.
म्यानमारचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ उपस्थित
या दौऱ्याच्या निमित्ताने म्यानमारमधील एक मोठे आणि महत्त्वपूर्ण शिष्टमंडळही भारतात आले आहे. या शिष्टमंडळामध्ये खालील मान्यवरांचा समावेश होता:
- खिन माउंग यी – राष्ट्रपती कार्यालयाचे केंद्रीय मंत्री
- टिन माउंग स्वे – परराष्ट्र व्यवहार मंत्री
- डॉ. कान झॉ – वित्त आणि महसूल मंत्री
- मिन नाउंग – कृषी मंत्री
- डॉ. चार्टी थान – उद्योग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विकास मंत्री
- डॉ. खिन नाइंग ऊ – म्यानमारच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर
- लेफ्टनंट जनरल मो म्यिंट स्वे – संरक्षण दल
महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या विशेष कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि इतर उच्चपदस्थ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुंबईत नुकत्याच झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींपैकी एक म्हणजे मुंबईतील एअर इंडिया इमारत अखेर महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आली आहे, ज्यामुळे मुंबईतील शासकीय आणि प्रशासकीय हालचालींना अधिक गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांचा हा दौरा भारत आणि म्यानमारमधील द्विपक्षीय आणि व्यापारी संबंध अधिक बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.