नवी मुंबई: महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील मेघालय ही केवळ दोन राज्ये नसून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या राष्ट्रीय संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देणारी सहोदर राज्ये आहेत. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड हा संपूर्ण परिसर भारताच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेला एक नवी आणि मोठी गती देणार असून, हाच प्रदेश देशाच्या विकासाचे पुढील मुख्य केंद्र ठरणार आहे, असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईतील खारघर येथील प्लॉट नंबर १४, सेक्टर १६ येथे आयोजित ‘मेघालय सदन’ (Meghalaya Bhavan) च्या जमीन हस्तांतरण आणि भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.
कला, शिक्षण आणि संस्कृतीचा अनोखा संगम
या सोहळ्याची सुरुवात महाराष्ट्र आणि मेघालयच्या राज्यगीताने झाली. या प्रसंगी मेघालयातील कलाकारांनी सादर केलेल्या प्रसिद्ध पारंपरिक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांच्याकडे मेघालय भवनाच्या जमिनीची अधिकृत कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही राज्यांमधील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकताना सांगितले की, ईशान्य भारतातील विद्यार्थी, संगीतकार आणि कलाकारांसाठी मुंबई व पुणे नेहमीच पसंतीची ठिकाणे राहीली आहेत. खारघरसारख्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी उभारले जाणारे हे ‘मेघालय भवन’ केवळ एक इमारत नसून, शिक्षणासाठी, उपचारासाठी किंवा सांस्कृतिक सादरीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे घर ठरेल.
नवी मुंबई परिसराचा झपाट्याने होणारा विकास
नवी मुंबई आणि कोकण परिसरातील आधुनिक पायाभूत सुविधांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या भागात जागतिक दर्जाची १२ अव्वल विद्यापीठे असणारी ‘एज्यु-सिटी’ (Edu-City) आणि आंतरराष्ट्रीय स्तराची ‘मेडी-सिटी’ (Medi-City) उभारली जात आहे. याशिवाय देशातील तब्बल ६० टक्के डेटा सेंटर क्षमता याच परिसरात विकसित होत आहे. या भागात वाढणाऱ्या नवनवीन उद्योगांमुळे संपूर्ण रायगड आणि नवी मुंबईचा कायापालट होत आहे. या विकासाच्या साखळीत ‘तिसरी मुंबई’ चा विकास देखील अत्यंत वेगाने सुरू असून यामुळे रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत.
कृषी, व्यापार आणि संस्कृतीत सहकार्याची नवी संधी
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी अवघ्या काही सेकंदांत जमिनीचा प्रस्ताव मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस व सिडकोचे विशेष आभार मानले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आज ईशान्य भारतातील राज्ये वेगाने प्रगती करत आहेत.
महाराष्ट्रासोबतचे जुने संबंध आठवत संगमा यांनी आगामी काळात कृषी, व्यापार आणि क्रीडा क्षेत्रात भागीदारी वाढवण्याचा विश्वास व्यक्त केला. विशेषतः मेघालयची प्रसिद्ध ‘लाखडोंग हळद’ (Lakadong Turmeric) आणि तेथील समृद्ध संगीत परंपरा महाराष्ट्राच्या माध्यमातून जगभरात पोहोचवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात जसे रायगड जिल्ह्यामध्ये फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे, तसेच कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान व व्यापार दोन्ही राज्यांच्या समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्यास अनेक वरिष्ठ नेते व अधिकारी उपस्थित होते:
- मेघालयचे प्रतिनिधी: उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग, मंत्री सोस्थेनिस सोहतुन, मुख्य सचिव शकील अहमद, आयुक्त सिरिल व्ही. डी. डिएंगडोह.
- महाराष्ट्राचे प्रतिनिधी: खासदार मिलिंद देवरा, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील.
- प्रशासकीय अधिकारी: कोकण महसूल आयुक्त रुबल अग्रवाल, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सिडकोचे मुख्य महाव्यवस्थापक अश्विन मुद्गल आणि इतर वरिष्ठ अधिकारी.
मेघालय भवनचे बांधकाम वेळेत आणि उत्कृष्ट दर्जाचे पूर्ण करण्यासाठी सिडको आणि महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही देखील याप्रसंगी देण्यात आली.