पुणे: पुणे आणि शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा (Pune-Sainagar Shirdi Express) शानदार शुभारंभ करण्यात आला आहे. या नवीन रेल्वे सेवेमुळे भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि किफायतशीर होणार आहे.
या विशेष सोहळ्याला मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत देवेंद्र फडणवीस यांनी, तर पुणे रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेचा शुभारंभ केला. या प्रसंगी विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि आमदार विवेक कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुणे रेल्वेची क्षमता पुढील साडेतीन वर्षांत होणार दुप्पट
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी पुणे रेल्वे परिसराच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता वाढवण्यासाठी हडपसर, शिवाजीनगर, खडकी, उरुळी आणि आळंदी परिसरातील विविध रेल्वे प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये पुणे जंक्शनचे आधुनिकीकरण, अतिरिक्त प्लॅटफॉर्मची उभारणी, आकुर्डी येथील मेगा कोचिंग टर्मिनल आणि अत्याधुनिक डिजिटल सिग्नलिंग यंत्रणा यांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांमुळे पुढील ३ ते ३.५ वर्षांत पुणे रेल्वेची क्षमता दुप्पट होणार असून, आणखी २० अतिरिक्त गाड्या चालवणे शक्य होईल.
तसेच, रेल्वेच्या विकासासाठी महाराष्ट्राला अर्थसंकल्पात तब्बल २३,९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील १२९ स्थानकांचा पुनर्विकास केला जात असून, त्यापैकी ९३ स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात सध्या २४ वंदे भारत एक्सप्रेस धावत असून, लवकरच वंदे भारत स्लीपर गाड्याही प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच, भविष्यातील मुंबई ते पुणे बुलेट ट्रेन प्रकल्पाद्वारे प्रवास अधिक वेगवान करण्याचा मानस शासनाचा आहे.
शेतकरी, विद्यार्थी आणि भाविकांना मोठा फायदा
पुणे हे राज्यातील प्रमुख शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र आहे, तर शिर्डी हे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या नवीन रेल्वे सेवेमुळे पुणे व परिसरातील साईभक्तांना शिर्डी प्रवासाचा उत्तम पर्याय मिळाला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांसाठी ही रेल्वे अत्यंत सोयीची ठरेल.
या एक्सप्रेसला खालील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे:
- दौंड कॉर्ड केबिन
- श्रीगोंदा
- अहिल्यानगर (अहमदनगर)
- राहुरी
- बेलापूर
या थांब्यांमुळे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी, संशोधक आणि स्थानिक शेतकरी यांना प्रवासाची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच, बेलापूर स्थानकामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या ‘शनि शिंगणापूर’ येथे जाणाऱ्या भाविकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणार गती
या रेल्वे सेवेमुळे केवळ प्रवासाची सोय झाली नसून, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील नागरिकांना पुण्यातील उच्च दर्जाच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. याशिवाय, शिर्डीमधील हॉटेल व्यावसायिक, स्थानिक वाहतूकदार आणि छोटे विक्रेते यांच्या व्यवसायाला गती मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण आणि निमशहरी भागांच्या विकासावर भर दिला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाला चालना देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.