मुंबई: महाराष्ट्रातील अतिदुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत आरोग्य सेवेचा अखंड दीप तेवत ठेवणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील सात खऱ्या ‘आरोग्य योद्ध्यांचा’ नुकताच मुंबईत गौरव करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
मुंबईतील आरोग्य भवन येथे आयोजित एका विशेष आढावा बैठकीदरम्यान हा सोहळा पार पडला. याप्रसंगी आमदार चित्रा वाघ, आरोग्य आयुक्त डॉ. सुनिल भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. कपिल अहेर यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा सन्मान केवळ वैयक्तिक कौतुक नसून, दुर्गम भागात रात्रंदिवस सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे आणि इतरांना प्रेरणा देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
अलीकडेच, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णांसाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांच्या पार्श्वभूमीवर, दुर्गम भागातील या आरोग्य सेवकांच्या कामगिरीचे राज्यभर कौतुक होत आहे.
सन्मानित करण्यात आलेले महाराष्ट्राचे ७ आरोग्य शिलेदार:
- १. डॉ. गुणवंत कांबळे (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मोलगी)
- २. डॉ. कांतीलाल पावरा (तालुका आरोग्य अधिकारी, धडगाव)
- ३. डॉ. संतोष परमार (स्त्रीरोग तज्ज्ञ, ग्रामीण रुग्णालय धडगाव)
- ४. डॉ. राहुल नायका (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा)
- ५. डॉ. हिमांशू चव्हाण (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र रोषमाळ खुर्द)
- ६. चमेली भताने (अधिपरिचारिका, प्राथमिक आरोग्य केंद्र डाब)
- ७. अंजना परमार (आरोग्य सेविका, तरंगता दवाखाना – बोट ॲम्ब्युलन्स, धडगाव)
माता व बाल संगोपनात मोलाचे योगदान
मोलगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुणवंत कांबळे यांनी २०१४ पासून दुर्गम भागात मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्यकाळात रुग्णालयातील प्रसूतीचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले असून, घरगुती प्रसूतींचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. तसेच, धडगावचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संतोष परमार यांनी गेल्या दोन दशककांहून अधिक काळ आदिवासी भागात अविरत सेवा दिली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरमहा १५० ते २०० यशस्वी प्रसूती केल्या जातात.
‘रस्ते कठीण असले तरी सेवा महत्त्वाची’
मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राहुल नायका यांनी लोकसहभाग आणि आशा स्वयंसेविकांच्या मदतीने गेल्या दोन वर्षांत आपल्या कार्यक्षेत्रात एकही माता मृत्यू होऊ दिला नाही. तर दुसरीकडे, धडगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा यांनी २३ वर्षे सेवा दिली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली धडगाव तालुक्याने पुरुष नसबंदी मोहिमेत उद्दिष्टाच्या २०० टक्क्यांपेक्षा जास्त कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
सरकार केवळ दुर्गम भागातील मनुष्यबळाचे कौतुकच करत नाही, तर ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचे नियमन व औषध व्यवस्थापन अधिक कडक करण्यावरही भर देत आहे, जेणेकरून ग्रामीण रुग्णांना सुरक्षित उपचार मिळावेत.
कुपोषण निर्मूलन आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा
रोषमाळ खुर्द येथील डॉ. हिमांशू चव्हाण यांनी कुपोषण आणि सिकलसेल रुग्णांच्या व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी दुर्गम भागात ४० हून अधिक सर्पदंश आणि १५ हून अधिक विंचूदंश झालेल्या रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.
नर्मदेच्या लाटांवर जीवनदायिनी सेवा आणि धाडसी परिचारिका
डाब प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिपरिचारिका चमेली भताने या गेल्या नऊ वर्षांपासून मुख्यालयात राहून सेवा देत आहेत. त्यांनी आजवर ९८५ यशस्वी प्रसूती केल्या आहेत.
सर्वात कौतुकास्पद कार्य म्हणजे नर्मदा नदीकाठच्या दुर्गम वस्त्यांमध्ये कार्यरत असलेल्या अंजना परमार यांचे. रस्ते नसलेल्या भागांमध्ये त्या ‘बोट ॲम्ब्युलन्स’ (तरंगता दवाखाना) च्या माध्यमातून आरोग्य सेवा पोहोचवतात. पूर परिस्थिती असतानाही त्यांनी जीव धोक्यात घालून गर्भवती माता, नवजात बालके आणि सिकलसेल रुग्णांपर्यंत औषधोपचार पोहोचवून अनेकांचे प्राण वाचवले आहेत.
“हेच तर आपल्या आरोग्य यंत्रणेचे खरे आधारस्तंभ” – आरोग्यमंत्री
या गौरव सोहळ्यात बोलताना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि मर्यादित साधनांमध्येही सेवा देणारे हे सर्व कर्मचारी आपल्या आरोग्य यंत्रणेचे खरे आधारस्तंभ आहेत. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”
या कौतुकामुळे राज्यातील इतर हजारो आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांना नव्या जोमाने दुर्गम भागात काम करण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल.