सिंधुदुर्ग: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्ण आणि रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि पत्तन विभागाच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पालकमंत्र्यांनी कामात हयगय करणाऱ्या आणि दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
रखडलेल्या कामांचे तातडीने वर्गीकरण करण्याचे निर्देश
पावसाळा तोंडावर आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील प्रलंबित कामांचे वर्गीकरण करून आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश नितेश राणे यांनी दिले. निधी किंवा तांत्रिक परवानग्याअभावी अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात यावी, जेणेकरून ही कामे ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण होतील.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. यापूर्वी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान राबवून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला होता. आता पायाभूत सुविधांच्या विकासाकडे त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.
स्थानिक अडचणी सोडवण्यासाठी संयुक्त बैठका
अनेकदा जमिनीचे वाद, स्थानिक पातळीवरील विरोध किंवा इतर प्रशासकीय अडचणींमुळे विकासकामे रखडतात. अशा संवेदनशील विषयांवर मार्ग काढण्यासाठी संबंधित नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन तात्काळ आणि सर्वमान्य तोडगा काढावा, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. लोकहिताच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश बागुल तसेच पूजा इंगावले हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर होणार कडक कारवाई
कामाचा दर्जा आणि वेळेचे पालन करणे प्रत्येक कंत्राटदारासाठी बंधनकारक असेल. जे ठेकेदार जाणीवपूर्वक काम लांबणीवर टाकत आहेत, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. पायाभूत सुविधांसोबतच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीदेखील पालकमंत्री आग्रही आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच सिंधुदुर्गात ऑनलाईन फसवणूक व बेकायदेशीर जुगारावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले होते.
पावसाळ्यात नागरिकांना त्रास नको!
पावसाळ्याच्या दिवसांत रस्ते, पूल आणि सरकारी इमारतींच्या अपूर्ण कामांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास टाळण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय राखून काम करावे. रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, पूल दुरुस्ती आणि बंदरांवरील कामे वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.